केरळच्या समुद्रात मालवाहू जहाज बुडाले   

कोची : केरळजवळ कोची येथील समुद्रात सुमारे १८४ मीटर लांबीचे एक  मालवाहू जहाज बुडाले. जहाजातील घातक पदार्थांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मदतकार्य राबवून २४ खालाशांची सुटका करण्यात आली.
 
लिबेरियन देशाचे मालवाहू जहाज ६४० कंटेनरसह प्रवास करत होते. त्यापैकी १३ कंटेनरमध्ये घातक पदार्थ होते. १२ कंटेनरमध्ये कॅलशियम कार्बाईडची वाहतूक केली जात होती. शनिवारी मध्यरात्री ते समुद्रात बुडाले होते. तटरक्षक दलाने जहाज समुद्राात बुडाल्याची माहिती दिली. आयएनएस सुजाता जहाजाने मदत कार्य राबविले. बुडणार्‍या जहाजांतून आणखी तिघांची सुटका केली. जहाजावर ८४.४४ मेट्रीक टन डिझेल आणि ३६७१. मेट्रीक टन फर्नेस ऑईल होते. घातक पदार्थ आणि तेल समुद्रात पसरल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. केरळची समुद्र किनारपट्टीवर पर्यटनस्थळे आहेत. तसेच जैवविविधता देखील मोठी आहे. त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रणासाठी पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय तटरक्षक दलाची विमाने प्रदूषण कोठे झाले आहे ? याचा शोध घेण्यासाठी पाहणी करत आहेत. सध्या तरी पाण्यात तेल पसरले नसल्याचे सांगण्यात आले. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. नौदल आणि तटरक्षक दलाची जहाजे समुद्रात बुडालेले जहाज समुद्र किनारपट्टीवर आणण्याचे प्रयत्न करत आहेत. 
 

Related Articles